बंद

रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे

चवदार  तळे, महाड :

ऐतिहासिक चवदारतळे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 20 मार्च 1927 रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावर प्रसिध्द आहे. या तळ्याची लांबी 100 X रुंदी 100 मीटर असुन सदरचे तळे 5.5 मीटर खोल असुन त्याचे अंदाजे क्षेत्रफ़ळ 2.5 एकर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत या तळ्यातील पाणी प्राशन करुन हा पाणवटा सर्वांसाठी खुला करुन दिला. या सत्यागृहामुळे सामाजिक समतेचे रणशिंग फ़ुंकले गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड या किल्ल्याच्या लगत असलेले महाड एक शहर. या शहराची लोकसंख्या 27,536 इतकी आहे. या शहराच्या मध्यभागी चवदारतळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने या शहराची भुमी पावन झाली आहे.

चवदारतळे सत्याग्रह इतिहासात प्रसिध्द असुन या लढ्याची स्मृती तसेच समतेचे प्रतिक म्हणुन दरवर्षी 20 मार्च हा दिन चवदारतळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा केला जातो. हा वर्धापन दिन साजरा करणे करिता संपुर्ण देशातुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी तसेच पर्यटक दरवर्षी आवर्जुन भेट देत असतात. या चवदारतळ्याचे सौदर्यीकरण महाड नगरपरिषदेने पुर्ण केले आहे.

या ऐतिहासिक चवदारतळ्याचे सौदर्यीकरणाचे काम व या सौदर्यीकरणाचा उद्घाटन सोहळा दिनांक 2 जुन 1992 रोजी संपन्न झाला आहे. आज सद्यःस्थितीत चवदारतळ्याच्या चारही बाजुने सुशोभित कठडे बांधणेत आले आहे व चवदारतळ्याच्या सभोवताली विजेचे खांब उभारुन त्यावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. चवदारतळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीपासुन सुमारे 100 फ़ुटावर पाण्यामध्ये चौथरा बांधला असुन या चौथ-यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडे दहा फ़ुट उंचीचा पुर्णाकृती ब्रॉझचा पुतळा उभारण्यात आला असुन त्या ठिकाणी जाण्यासाठी पुल बांधणेत आला आहे व पुतळ्याच्या चबुत-यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार कोरलेले आहेत. चवदारतळ्याच्या पश्चिम बाजुकडील जागेमध्ये एक बहूद्देशिय सभागृह बांधण्यात आले असुन या सभागृहाच्या तळमजल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्वाच्या घटनांबाबत स्मृतीचित्र / तैलचित्र तयार करण्यात आले असुन या सभागृहाचा उपयोग विविध सभा / कार्यक्रम इ. साठी करण्यात येत आहे व या सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर वाचनालयाची सोय आहे. ज्या पाय-यांवरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळ्यामध्ये उतरुन सत्याग्रह केला त्या पाय-यांचे सुशोभिकरण करण्यात आले असुन त्या ठिकाणी सांची येथील स्तुपाच्या धर्तीवर एक मुख्य कमान (आर्च) उभारणेत आली आहे तसेच त्या पाय-यांजवळील भिंतीलगत सत्याग्रहाच्या वेळेच्या प्रसंगाचे चित्र प्रदर्शित करणारे भिंतीचित्र ट्रीमेट्स मध्ये करण्यात आले आहे. सभागृहाच्या समोरील जागेमध्ये आकर्षक बगीचा करण्यात आला आहे व तेथे बागेच्या मध्यभागी हायमास्ट लायटिंग करण्यात आले आहे.

चवदारतळ्यापासुन जवळच दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह मनुस्मृती दहन करुन सामाजिक विषमतेला तिलांजली दिली. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ पिपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या मालकीच्या जागेमध्ये क्रांतीस्तंभ उभारण्यात आला आहे. हा क्रांतीस्तंभ सामाजिक समतेचे प्रतिक म्हणुन ओळखला जातो.

या ऐतिहासिक चवदारतळ्याचे ठिकाण महाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असुन महाड शहर हे सावित्री नदीच्या किनारी वसलेले आहे. या शहरापासुन महत्त्वाच्या ठिकाणांचे अंतर खालील प्रमाणे आहे.

  1. मुंबई ते महाड – 175 कि.मी.
  2. पुणे ते महाड – 110 कि.मी
  3. महाड ते किल्ले रायगड – 24 कि.मी.

या शहराच्या हद्दीलगत राष्ट्रीय महामार्ग (मुंबई – गोवा महामार्ग) जात आहे.

छायाचित्र दालन

  • चवदार तळे.
  • चवदार तळे पुढचा भाग
  • चवदार तळे दृश्य

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.

रेल्वेने

सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.

रस्त्याने

रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसांद्वारे रस्त्यांनी जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसवेने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे सुरु होतो , तो पोलादपूरमार्गे पूर्ण जिल्ह्तातून जातो.